यंत्रमाग उद्योजकांत अस्वस्थता ; उद्योग सापडलेत आर्थिक संकटात

यंत्रमाग  उद्योजकांत अस्वस्थता ; उद्योग सापडलेत आर्थिक संकटात इचलकरंजी (कोल्हापूर) विविध संकटामुळे यंत्रमाग उद्योगात अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. सातत्याने नवनवीन संकटे या उद्योगासमोर येत आहेत. त्यामुळे यंत्रमाग उद्योजक हतबल होत आहेत. यातून आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ऑटोलूम उद्योजक अमर डोंगरे यांच्या मृत्यूनंतर यंत्रमाग उद्योगातील अस्वस्थता अधिकच वाढीस लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर शासनाने या उद्योगाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून मदतीचा हात द्यावा, अशी भावना उद्योजकांत निर्माण होत आहे. तीन-चार वर्षांपासून यंत्रमाग उद्योग अडचणीतून जात आहे. उद्योगाच्या दयनीय अवस्थेचा विषय विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही गाजला होता, मात्र अद्यापही या उद्योगाच्या परिस्थितीमध्ये दिलासादायक सुधारणा झालेली नाही. उलट दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. यातून हा उद्योग सावरण्यासाठी शासनाच्या मदतीची गरज आहे, पण या उद्योगाच्या बाबतीत शासन नेहमीच उदासीन राहिले आहे. उद्योगातून प्रगती होण्याऐवजी आर्थिक संकटात सापडत चालल्यामुळे दोन वर्षांत २० पेक्षा जादा यंत्रमागधारकांनी आपले जीवन दुर्दैवीरीत्या संपवले आहे. या उद्योगाची वेळीच परिस्थिती न सुधारल्यास शेतकऱ्यांप्रमाणे यंत्रमागधारकांचेही आत्महत्येचे सत्र नजीकच्या काळात सुरू होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. यंत्रमाग उद्योजकांनी बॅंका, पतसंस्था व वित्तीय संस्थांकडून मोठ्या प्रमाणात कर्जाची उचल केली आहे. पुढे परिस्थिती सुधारेल, या आशेने उद्योजक नुकसानीत जाऊनही उत्पादन करीत आहेत, पण त्यातून दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याचे चित्र आहे.व्यवसायात असणारी मंदी, यंत्रमागाच्या सुट्या भागाचे वाढते दर, वीज दरात वाढ, कामगार मजुरी, सूत दरवाढीप्रमाणे उत्पादित कापडाला न मिळालेला दर, सुताचा काऊंटमधील घोळ अशा विविध कारणांनी यंत्रमागधारक मेटाकुटीला आला आहे. यामुळे उद्योग नुकसानीत जात असल्याने कर्जाची परतफेड करताना नाकीनऊ येत आहे. आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल यंत्रमाग उद्योजकांनी उचलू नये. केंद्र व राज्य शासनानेही आता या उद्योगाला भरीव मदत देण्याची भूमिका घ्यावी." सतीश कोष्टी, अध्यक्ष, दि इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशन

Leave a Comment: